गुरुपौर्णिमा!!!(Article/Lalit lekh/Lekh)
गुरुपौर्णिमा!!!!
गुरुपौर्णिमा!!!! , नशिबाने आयुष्यात भेटलेले अनेक शिक्षक केवक शिक्षक न राहता गुरु बनले , कारण ते खरच केवळ पगारी शिक्षक नव्हते , अन इतरही अनेक मनसे आयुष्यात अशी आली कि जी गुरुस्थानी होती , आहेत . घरातच पहिला गुरु आपल्याला भेटतो तो आईच्या रूपाने , आणि हि परंपरा सुरु होते . पूर्वी गुरु - शिष्य परंपरेमध्ये एका गुरुकडून ज्ञान प्राप्ती करून घ्यायची , आणि ती परंपरा पुढे सुरु ठेवायची . आता मात्र आपल्यला आपल्या गुरु शोधावा लागतो , कधी तो एखाद्या मोठ्या माणसात , कधी आपली गुरुजानाच्यात , कधी एकाद्या लहान मुलात , तर कधी एखद्या पुस्तकात, गाण्यात हि तो भेटतो . मी आधी लिहालेला एक छोटासा लेख परत एकदा , फक्त आणि एक गोष्ट , कधी कधी शिष्य आणि अनुयायी गुरु ला काय सांगायचे आहे याचा विपर्यास करून , गुरुचाच पराभव करतात , ते मात्र सांभाळायला हवे
गुरु पोर्णिमा अर्थातच व्यास पोर्णिमा. व्यासकृत महाभारत लक्षात घेता, ते खर तर आद्य गुरूच. महाभारत मध्ये मनुष्य स्वभावाचे, नात्यांचे, गुण दोषांचे इतके कंगोरे दाखवले आहेत, कि असे म्हणावेसे वाटते कि त्याच्या पलीकडे काही उरतच नाही. प्रत्येक्ष गुरु शिष्यांचे नाते महाभारत मध्ये इतक्या प्रकारे दर्शवले आहे कि, मग ते कृष्ण -अर्जुन, एकलव्य - द्रोणाचार्य, अर्जुन- द्रोणाचार्य, कर्ण-द्रोणाचार्य, कर्ण - परशुराम, कर्ण -सूर्यदेव, अगदी अभिमन्यु- सुभद्रा आणि कृष्ण - राधा सुद्धा.
गुरु शिष्य परंपरा इतकी मोठी आहे कि त्या बद्दल लिहावे तितके थोडेच. पहिला गुरु साक्षात आई वडील च असतात. असे म्हणतात कि " गुरुविण कोण दाखवील वाट", आणि योग्य मार्ग दाखवण्याचे पहिले मार्गदर्शक असतात ते आपले आई वडीलच. मला नेहमीच असे वाटत आले आहे कि आपण शालेय जीवना मध्ये जे घडतो ते आयुष्यभारासाठी शिदोरी असते. शाळे मधील शिक्षक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. मला आज नक्की सांगावेसे वाटते कि मी इतकेइ सुदैवी आहे कि, खूप चांगल्या गुरूंचा सहवास लाभला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शिकवणे म्हणजे ज्ञान- दान आहे, या भावनेने शिकवणारे शिक्षक आयुष्य भर लाभले.
साक्षात परमेश्वराने पण गुरु केले आहेत, असे आपली संस्कृती, महाकाव्ये सांगतात. राम, कृष्ण, यांनी गुरूगृही शिक्षण घेतले. पंचतंत्र कथांची निर्मिती हि गुरुनी आपल्या शिष्यांना दिलेली देणगीच होय. सवाई गंधर्व या सारखा महोत्सव सुरु करून पंडित भीमसेन जोशीनी, गुरु प्रेमाची महतीच धकवून दिली आहे.
गुरु, किती महान कार्य करू शकतो याचे अनेक दाखले देता येतील. सर्वात पहिले असे नाव लक्षात येते ते म्हणजे चाणक्य - आणि त्यांनी घडवलेला सम्राट चंद्रगुप्त मोर्या याचे. जुलमी राजाचा विरोध थम केला तो चाणक्य यांच्या पित्याने, जे स्वतः एक गुरु होते. गुरूच्या(धौम्य ऋषी) आज्ञा पूर्ण करता यावी म्हणून सर्वे काही पणाला लावणाऱ्या अरुणीची गोष्ट आपण खचितच विसरलो आहे, तसेच कधी कधी असे वाटते कि शिवाजी राजांचे खरे गुरु कोण या वादात पडून आपण हे विसरलो आहे कि , गुरुस्थानी व्यक्ती साठी जात, धर्म, नसते त्याहून पुढचे म्हणजे गुरूला मोठेपणा घेण्यात तर स्वारस्य नसतेच नसते, शिष्याचा उत्कर्ष पाहूनच गुरु ला खरे समाधान मिळते.
आज काल स्वतःला गुरु म्हणवून घेणाऱ्या लोकांमागे पळणारे लोक पहिले कि वाटते, अरे कशाला असे गुरु शोधत फिरता, आपल्या कडे गुरु आहेतच. आपले अनेक ग्रंथ, साहित्य आणि साहित्यकार इतकी मोठी परंपरा असलेल्या आपल्याला, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकोबा, एकनाथ, रामदास, टिळक, सावरकर, फुले, कर्वे, आगरकर, जिजाऊ, सावित्री बाई, रमाबाई, डॉक्टर आनंदी बाई जोशी हे का बरे नाही दिसत?
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने इतकेच सांगावेसे वाटते कि, जो जो आपल्याला काय चांगले आणि काय वाईट याची शिकवण देतो आणि कोणत्याही प्रसंगामध्ये सद्सद विवेक बुद्धी जागृत राहावी याचे बाल देतो तो आपला गुरु. मग ती व्यक्ती असेल, पुस्तक असेल किंवा साक्षात निसर्ग देखील असेल. जसे मातृ ऋण न फिटणारे, तसेच गुरुचे हि ऋण न फिटणारे. या निमित्ताने मी केवळ मला गुरु स्थानी असणाऱ्या साऱ्याचे आभारच मानू शकते
चुकली वाट काळोखात
धरला म्हणुनी गुरूचा हात
कसे फेडावे हे ऋण गुरुचे
आयुष्य जाईल हे सरुनी आमुचे
- शीतल

Comments
Post a Comment