मैत्री आणि जयकथा (महाभारत.) !! #मैत्री #महाभारत #जयकथा #friendshipday

मैत्री आणि  जयकथा (महाभारत.) !!
#मैत्री #महाभारत #जयकथा #friendshipday

जयकथा म्हणजेच महाभारत. माझे अत्यंत आवडीचा विषय. जितके   मी या बद्दल वाचेन , विचार करेन  ते तोकडेच आहे.
असंख्य नाती आणि त्याचा   भावनिक लेखा जोखा आणि  त्या  संबंधाची कोडी आणि त्यांची उकल, हे सगळे म्हणजे  जयकथा. सामान्य वाटावी अशी पण असामान्य माणसे.
मैत्रीचे हे  नाते अनेक वेळा  या महाकाव्यामध्ये येत  रहाते.
कृष्ण आणि पेंद्या  यांची लहान पणीची मैत्री. मग सुदाम आणि कृष्णाची मैत्री . पण  या मैत्रीला काही मर्यादा आहेत किंवा त्या बद्दल केवळ काही घटनाच  आहेत.  तीच कथा द्रुपद  आणि द्रोण यांची. नाट्य आहे या मैत्री मध्ये  पण नात्यावर भाष्य नाही.
मग नात्यावर भाष्य करणाऱ्या मैत्री म्हणजे कृष्ण - अर्जुन आणि दुर्योधन आणि कर्ण यांच्या. या नात्याला  बरेच कंगोरे आहेत. पण अर्जुन अन कृष्णाच्या नात्याला अजून एक पदर आहे तो म्हणजे गुरु - शिष्य नात्याचा, भक्तीभावाचा  ; म्ह्णून यामध्ये एक  अदृश्य अंतर दिसत राहते. दुर्योधन आणि कर्णाच्या नात्याला पण एक वेगळा पदर आहे;  अव्हेरलेल्या ,  स्वतःच्या  जन्माचे  रहस्य शोधणाऱ्या  कौन्तेयला एक सामाजिक स्थान  देण्यात  दुर्योधन कारण झाला, त्याने मदत केली  ; मग कदाचित त्याच्या   स्वतःच्या स्वार्थ साठी  असेल. पण त्या एका ऋणाच्या जाणिवेतून  कौंतेयानी  ती मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत जपली. म्ह्णून कदाचित  या मध्ये पण एक अदृश्य अंतर आहे
पण अनुल्लेखलेल्या  अजून दोन अश्या मैत्री या महा काव्यात आहेत , ज्या मला खूप भुरळ  घालतात. त्याना कुणीच रूढार्थाने  मैत्री म्हणत नसेल; पण माझ्या साठी त्या   मैत्रीचेच  नाते दर्शवतात.  खूप वेगळ्या आहेत. जात -पात , सामाजिक स्थान, वय, स्त्री-पुरुष या पलीकडे जाणाऱ्या विशुद्ध मैत्री. केवळ हितचिंतक  असूनही मायेचा एक वेगळा पदर असलेली  मैत्री.
एक म्हणजे द्रौपदी आणि कृष्ण यांची मैत्री ,  आणि दुसरी म्हणजे विदुर आणि कुंती.   सखा आणि सखी म्हणावी अशी द्रौपदी आणि कृष्णाची मैत्री. ज्या क्षणी, तिला   न्याय द्यायला धर्मराज सुद्धा अकार्यक्षम  ठरला,  भरतकुळातील सारे वीर तिची अवहेलना पाहत राहिले तेव्हा धावून आला तो कृष्ण. तो काय रूपाने आले हे  अनेक रूपक कथेतून विविध पद्धती मधून समोर आले असेल; पण या कृष्णेच्या बाजूनी तोच   उभा राहिला  हे सत्य. अशीच एक कथा  तिच्या थाळीची सुद्धा.  तिच्या मनाचा थांग कित्येकदा  त्यालाच लागला. जांभूळच्या  फळाची सुद्धा जी गोष्ट आहेत त्यात हि कृष्ण  आणि द्रौपदीचा  संवाद महत्वाचा आहे. लौकिक  नात्यांच्या पलीकडे जर तिला कोण  जास्त जवळचे  असेल तर कृष्ण . मला ते नेहमीच  केवळ मानलेले भाऊ बहीण न वाटता, खूप चांगले मैत्र वाटले आहेत. एक तरी मित्र - सखा असा लागतोच जो रक्ताच्या किंवा सहजीवनाच्या  नात्या बाहेरचा असेल आणि तितकाच महत्वचा  आणि विश्वासाचा

दुसरे  नाते आहेत विदुर आणि कुंतीचे, कदाचित कुणीच या  कडे  मैत्री या नात्यांनी पहिले नसेल. पण मला मात्र त्यात एक निखळ , हितचिंतकांची मैत्री दिसते.  कुंती , विदुर आणि विदुर पत्नी सुलभा यांचे एक वेगळेच  नाते आहे, जे झाकोळलेले आहे या साऱ्या  जय कथेत. ज्या ज्या वेळी  कुंतीला गरज होती त्या त्या वेळी हितचिंतक म्हणून जर कुणी धावून गेले तर ते विदुर. मग पंडूचा मृत्यू असो, लहान पांडवांचे  संगोपन असो, लाक्षागृहाच्या प्रसंगातली मदत असो, विदुर अतिशय खंबीरपणे कुंतीच्या मागे उभे होते.
द्युतामध्ये सगळे हरल्यावर जेव्हा पांडव आणि  द्रौपदी  पुन्हा वनवासाला  गेले तेव्हा कुंती  मात्र हस्तिनापूर येथेच  होती, आणि राजप्रसादात न राहता ती राहिले विदुराच्या घरी.  हा  एक प्रसंग नक्कीच सांगून जातो एक तरल नाते,  जे रक्ताच्या नात्यांच्या पलीकडचे आहे. विदुर , त्याची पत्नी आणि  कुंती यांच्या मधले एक असे नाते जे अत्यंत वेगळे अन तरल आहे, हे तिघे हि आपापले आयुष्य जगत असताना ,  वेदना आणि उपेक्षा यांचा एक धागा पण कदाचित एकत्र जगत होते. कुंतीचे सगळे आयुष्य हे वेदनेचा एक प्रवास आहे , आणि त्यात तिच्या बाजूनी खंबीर पणे  एक  सुहृद म्ह्णून जर कोण उभे असेल तर ते विदुर. युद्ध  सम्पल्यावर सुद्धा  धृतराष्ट्र, गांधारी , कुंती आणि विदुर  यांनी वानप्रस्थ स्वीकारले आहे. प्रत्येक  टप्प्यावर  हितचिंतक असणारा , वाट दाखवणारा , न्यायबुद्धीने वागणारा, असा एक सुहृद.  आणि निस्वार्थी बुद्धीने एकमेकांसोबत असणे  हीच मैत्री नव्हे काय.

या चौघात काही गोष्टी समान आहेत ज्या त्यांना एकत्र बांधून ठेवतात. यज्ञातून जन्मलेली  द्रुपद कन्या, राजकन्या , मात्र नंतरचे सारे आयुष्य खडतर , वनवासात. त्यातून हि, पाच पतींशी संसार करायची कसरत. आणि  इतके सारे करून, मानहानी . अहंकारी अशी टीका. आणि पाच पुत्र गमावण्याच दुःख .  कृष्णाचे  तर बालपणच संकटाचा सामना करत.  सांभाळणारे आई वडील वेगळेच, लहान वयातच कंस  मृत्यूनंतर   येऊन पडलेली राज्याची जबाबदारी,  गोपाळ अशीच असलेली ओळख आणि त्यातून झालेली उपेक्षा सुद्धा , संपूर्ण कुळच नष्ट  झाल्याचा क्षण,  मैत्री मध्ये  सुद्धा सतत गुरुची  घावी लागलेली भूमिका,  अश्या साऱ्यात  जी काही निखळ  नाती त्याच्या वाट्याला आली त्यात त्याची अन कृष्णेची मैत्री विशेष. एका क्षणात , शालू फाडून त्याची चिंधी बांधून भळा भळा  वाहाणारी  जखम  बांधणारी  सखी. हि  कथा रूपक अर्थाने विचार केली तर लक्षात येईल कि एका क्षणाचा हि विलंब न करता जखमेवर फुंकर घालणारी निस्वार्थी सखी आणि तिच्या  मानहानीच्या काळात , केवळ आणि एकमेव  असा तिच्या  साठी उभा राहणारा हा कृष्ण सखा.
विदुर आणि कुंती मध्ये पण काही समान धागे  सापडतातच ; म्हणून त्यांच्यात हि एक अनुकंपेचा , मायेचा धागा बांधला आहे. कुंतिभोज राजाची कुंती, हि वयाच्या ८ व्य वर्षीच दत्तक म्ह्णून  त्याच्या घरी आली, स्वतःचे घर, माता पिता सोडून.  किशोर वयातच कुमारी माता झाली आणि  अतंत्य  कठीण परिस्थिती मध्ये पुत्रवियोग सहन केला. तरुण वयात महाराणी झाली ; पण नशिबात  वनवासच. पुत्र झाले पण पंडूचे नाहीत  हे सतत ऐकून  घ्यावे लागले आणि हक्का  साठी  सतत लढावे लागले.  पंडूनंतर , मुलांना मोठे करायची जबाबदारी. सतत नशिबी आलेला वनवास, लढाई , आणि  पदरी पडलेली अवहेलना. विदुर चे पण नशीब बालपणापासून असच, ओळख दासी पुत्र अशीच . व्यास पुत्र असण्याची सगळ्यात चांगली आणि  उत्तम  लक्षणे ज्याच्यामध्ये होती त्याला केवळ दासीपुत्र म्हणून  ओळख मिळाली. कुंतीला  राज्य हक्कासाठी लढायला लागले पण विदुराला तर त्या साठी लढायचं पण हक्क नव्हता.
अशीच उपेक्षित आणि शापित असणारे असे हे चार जीव ; जेव्हा एकमेकांसोबत उभे होते तेव्हा  अत्यंत तरल ,  निखळ आणि निस्वार्थी बुद्धीने एकत्र राहिले हेच सत्य आहे. हा मैत्रीचा एक सूक्ष्म  पण उपेक्षित धागा त्यांनी जपला हे पण जय कथेतले  एक सत्य आहे. साऱ्या  वेदना  सहन करताना हि अशी मैत्री अन सुह्र च हवेत.
आज या मैत्री  दिना निम्मित , मनातले विचार लिहावेसे वाटले इतकच.   हे केवळ माझे विचार आहे ,  त्याच्या सोबत सहमत असावच असे काही नाही.

एक सखा - सखी , सुहृद जपा आयुष्यात अन असेच कुणाचे तरी मैत्र बनण्याचे  भाग्य तुम्हाला लाभो हीच सदिच्छा !!१

©शीतल जोशी

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी